
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके विरहिणी अभंग ८९२
पैल तो गे काऊ कोकताहे । शकुन गे माये सांगताहे ॥१॥ उड रे उड रे काऊ तुझें सोन्यानें मढीन पाऊ । पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥ दहिंभाताची उंडी लावीन तुझ्या तोंडीं । जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगीं ॥३॥ दूधें भरूनी वाटी लावीन तुझे वोंठी । सत्य सांगें गोठी विठो येईल कायी ॥४॥ आंबया डाहाळी फळे चुंबी रसाळीं ।आजिचे रे काळी शकून सांगें ॥५॥ ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणे । भेटती पंढरीराणे शकुन सांगे ॥६॥
अर्थ:-
एक विरहिणी, विरहाने दुःखित होऊन बसली असता आपल्या घरांवर पलीकडच्या बाजूला कांवळा कोकू लागला. तो शुभ शकुन सांगतो आहे.असे समजून शुभशकुन सांगणाऱ्या कावळ्याला म्हणते उड रे उड काऊ, तुझे पाय सोन्याने मढविन पण एवढे सांग की माझ्या घरी पंढरीराव पाहुणे कधी येतील. दहीभाताची उंडी करून तुला खाऊ घालीन पण जीवाला प्रिय असणाऱ्या पंढरीरायांची गोडी केंव्हा प्राप्त होईल. ते लवकर सांग.दुधाने वाटी भरून तुझ्या ओठाला लावीन पण तो विठोबाराय माझ्या घरी येईल काय हे खरे सांग.आंब्याच्या डहाळीला आलेली रसाळ फळे ही चाख, पण आजच्या वेळी मला शुभशकुन सांग. अशा त-हेची तळमळ लागली असता पंढरीराजे भेटतील, असा शकुन सांग.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.