👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके पाळणा अभंग ८७४
पाच पाट्या नव खिडकिया । पाळणा पहुडाया निरंजनीं ॥१॥ एकवीस सहस्र श्वास हुंकार घाली । माया ते मारिली ज्ञानरूपी ॥२॥ तेथें निरंजन नाहीं कांहींचि नाहीं । तेथें निःशब्द उठती पाहीं ॥३॥ बापरखुमादेविवरू बाळका घेऊनी गेला । मरोनियां झाला जितपणे गे माये ॥४॥
अर्थ:-
ज्या स्थूलदेहामध्ये पांच कोश म्हणा किंवा पंचप्राण म्हणा व नऊ खिडक्या नऊ द्वारे, अशा पाळण्यांत परमात्मा आत्मरूपाने निजला आहे. आणखी एकवीस हजार श्वासोश्वास हे हुंकार घालीत आहेत. आणि ज्या आपल्या ज्ञानस्वरूपाने मायेचा नाश केला. त्या ज्ञानस्वरूपांच्या ठिकाणी कोणताच आत्मभाव नाही इतकेच नाही तर निरंजन परमात्मरूपाचाही भाव नाही. त्या परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी निःशब्दरूपी शब्द उत्पन्न होतात. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते या बालकाला घेऊन म्हणजे अनात्मभावाने मारून आत्मभावाने जिवंत राहिला. असे माऊली सांगतात.
