👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके हमामा अभंग ८५५
हमामा रे पोरा हमामा । घुमरी वाजे घुमामा ॥ध्रु. ॥ घुमरीचा नाद कानीं । घुमरी घालूं रानी । रानी शीतळ छाया । मेली तुझी माया । मायेचें घर दुरी । तुज मज कैंची उरी रे पोरा ॥१॥ उरी नाहीं तुज । मजसी मांडिलें जुंझ । जुंझी अहंकार ढळे । कल्पना समूळ गळे । गळतां गळतां पाहिली । कान्होबा चरणी राहिली । कान्होबा पाहे दिठी । तुज मज पडिली मिठी रे पोरा ॥२॥ मिठी मिठी करी पाहासी । आतां कोठें राहसी । राहतां ठावो येकु । फटी तो तुझा लेंकु । लेंकु गाई राखे । बाप गोरसु चाखे । चाखतां घेतली गोडी । तोची फांसा तोडी रे पोरा ॥३॥ पोरा ऐक माझी गोठी । राग धरी न पोटीं । रागें काम नासे । अहंकारें बोचा वासे । वासिले रावणें डोळे । भेणें द्वैत कंस पळे । पळतां पळतां लागला पाठीं । तुज मज आतां गांठी रे पोरा ॥४॥ पोरा गोठी करी ऐसी । संतांसी मानेल तैसी । बापरखुमादेविवरु ध्यासी । तरी वरिल्या गांवां जासी रे पोरा ॥५॥
अर्थ:-
( हमामा नावांचा एक प्रकारचा मुलाचा खेळ असून त्यामध्ये घुमरी नावांचे एक प्रकारचे वाद्य वाजवित असतात) आता आपण हमामा म्हणजे मी आणि आम्ही (हम म्हणजे मी आमा म्हणजे आम्ही) असा खेळ खेळत आहोत. त्या खेळांत घुमरी म्हणजे धुंदी तिचा घुमधुमाट काढून आपल्या कानांवर येत आहे. ही घुमरी रानांत म्हणजे परमात्मस्वरुपांच्या ठिकाणी घालू. रानामध्ये फार शीतल छाया आहे. रान म्हणजे परमात्मस्वरुप असून परमात्म स्वरुपांच्या ठिकाणी. गेले असता देहादिक भाव हे कार्यरुपाने मायाच आहेत. ती तुझी माया आतां मेली म्हणून समज. अरे, परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी गेलो म्हणजे मायेचे घर फार दूर राहिले. आणि त्यामुळे तुझ्यांत आणि माझ्यांत भेद कोठे शिल्लक राहिला. तूं मी असा द्वैतभाव नसता तूं माझ्याशी खेळण्याचे झुंज मांडले आहेस. त्यांत अहंकार नष्ट होतो. कल्पना समूळ जाते. कल्पना गळून पाहिले तर चित्तवृत्ति कान्होबाच्या चरणी लीन राहाते. असा तो कान्हा श्रीकृष्ण दृष्टीने पाहा. म्हणजे तूं आणि मी अशा द्वैतभावाला मिठी पडेल. नुसती शब्दाने मिठी म्हणू नकोस तर मिठी म्हणजे ऐक्य करुन पाहू लागलास तर आतां त्या एका परमात्म्याशिवाय कोठे राहाशील. हा विचार सुटला तर तुझ्यापासून उत्पन्न झालेला लेक म्हणजे अहंकार तो गायी म्हणजे इंद्रिये राखू लागला. तर त्या अहंकाराचा बाप जो जीव तो गोरस चाखतो. म्हणजे विषयभोग घेतो त्या विषयभोगामुळे जी गोडी उत्पन्न होते. तीच या. जीवाला फांसा आहे रे तो फांसा तूं सोडून टाक. तुला आणखी एक गोष्ट सांगतो ती ऐक मनांत राग धरु नकोस कारण मनांत राग म्हणजे क्रोध उत्पन्न झाल्याने इच्छित कामाचा नाश होतो. अहंकार वाढतो. त्याने गांड फांटून जाते. पहा ह्या अहंकाराने रावणाचे डोळे फाडले. भयाने कंस पळू लागला. पळता पळता कृष्ण पाठीस लागून कृष्णाने त्यास मारले. मी सांगितलेली ही गोष्ट तिचा विचार कर. पोरा संतांना मानेल अशी गोष्ट बोल. ती गोष्ट म्हणजे एवढीच की माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्याचे जर ध्यान करशील तर वर सांगितलेल्या परमात्म्याच्या निर्गुण स्वरुपांच्या गावाला जाशील. असे माऊली सांगतात.
