👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-११ वे, बुद्धीरूपी सखीशी संवाद अभंग ८२५
सांग सखिये बाई मज हे नकळे । कैसा हा अकळे समतेजें ॥१॥ भावदृढ धरी चित्ताची लहरी । प्रकृती कामारी सत्रावीची ॥२॥ येरी म्हणे वांजट झाली वो पुराणें । समरस जाणे कोणे घरीं ॥३॥ ज्ञानदेव म्हणे आदिमध्य समता । सुखें पहातां चढे हातां ॥४॥
अर्थ:-
एक सखी आपल्या मैत्रिणीस विचारते की एकरूप होऊन हा श्रीहरि आपल्या ताब्यांत कसा येईल हे मला कळत नाही. मैत्रिण उत्तर देते. श्रीहरिच्या प्राप्तीचा उपाय प्रथम दृढभाव असू दे. श्रीहरिच्या ‘कामारी’ म्हणजे आधीन असणारी जाति तिचे कार्य जे काम क्रोधांदिक ते ब्रह्मप्राप्ताच्या आड येतील. पुन्हा सखी प्रश्न करते. या गोष्टी सांगून सांगून पुराणे थकली. पण अशी एकरूपता कोणाला अनुभवावयास मिळाली आहे काय? तेव्हा दुसरी सखी उत्तर देते. ज्या सखीने जगत कोणापासून उत्पन्न झाले, कोणावर राहिले, व कोणाच्या ठिकाणी लय झाले. याचा स्वस्थचित्ताने विचार केला असेल तर तिला ब्रह्मस्वरूपाशी एकरूपता साधते. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.