👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-११ वे, बुद्धीरूपी सखीशी संवाद अभंग ८२४
सखी म्हणे बाई समपण तें कैसें । येरी म्हणे देश हिंडू नको ॥१॥ आधी शोधीं आप मग पाहीं दीप । कोहं सोहं रूप दवडी दुरीं ॥२॥ त्रिपुटीं झोंबों नको मायावी सकळ । अवघा सरळ हरि आहे ॥३॥ ज्ञानदेव बुझवी बुझे ज्ञानधारण । तुज मज सौजन्य येणे न्यायें ॥४॥
अर्थ:-
एक सखी, दुसऱ्या सखीला विचारते बाई साम्यावस्था ती काय ग? सखी म्हणते, अग या नादाने उगीच इकडे तिकडे म्हणजे भलत्याच साधनांत तूं गुंतू नकोस. कारण ज्ञाता, ज्ञान ज्ञेयादि सर्व त्रिपुट्या मायाकार्य आहेत. त्यांना तूं झोंबू नकोस कारण यश्चावत् सर्व त्रैलोक्यां श्रीहरिच आहे. याकरिता तूं अगोदर ‘कोऽहं’ म्हणजे मी कोण आहे. याचा विचार कर. व असा विचार केला असता सोऽहं’ म्हणजे तो परमात्मा मी आहे. असा आपला अनुभव घे. व ती वृत्ति सुद्धा टांकून दे. या ज्ञानधारणेला तूं समजून घेतले आणि ती वृत्ति निवृत्त केली असता तुझ्या माझ्यामध्ये एकरूपता होईल. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
