👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-११ वे, बुद्धीरूपी सखीशी संवाद अभंग ८२३
येरी म्हणे भेद सृष्टी दाविती शब्द । तत्त्वी तत्त्व बोध कोठे गेलें ॥१॥ सखी म्हणे बाई आकाराची सोय । तुज मज काय इयें देहीं ॥२॥ चपळता सांगों उष्णता घोटी । घोटूनियां होटी समब्रह्मीं ॥३॥ ज्ञानदेवीं तट भाग्य जैं उत्कट । रौं हे वाक्पटपडती दृष्टी ॥४॥
अर्थ:-
एक सखी दुसरीला म्हणते हे सखे, सृष्टीमध्ये जेवढे म्हणून भेद प्रतितीला येतात.ते सर्व वेदरूपी शब्दच दाखवितात. मग तत्त्वविषयक एकत्व प्रतिपादन करणारा तत्त्वबोध कुणीकडे जाईल. म्हणजे तो देखील त्यांत वर्णन केलेला आहे. दुसरी म्हणते या देहामध्ये दिसणाऱ्या आकारांची सोय म्हणजे शेवट तुला मला काय कळणार? म्हणजे या देहाचा शेवट काय कळणार? त्यावेदवाक्यांच्या ठिकाणी चपलता म्हणजे विलक्षणता कां दिसते? हे तुला काय सांगू? म्हणजे वेदवाक्यांतील विरोध निवृत्त होण्याला उष्णता म्हणजे कठीण साधने आहेत. ती घोटोनियां म्हणजे स्वाधीन करून घेऊन गुरुमुखाने त्या विरोधी वाक्यांची एकवाक्यता यथार्थ समजून घेऊन ब्रह्माशी एकरूप हो. हे वाक्याचे तट म्हणजे भेद पूर्वजन्मीचे अत्युत्तम भाग्य जर उदयाला आले तरच गुरुद्वारा या वाक्यांची एकवाक्यता दृष्टिस पडेल. म्हणजे वेदवाक्यांतील परस्पर भासणारा विरोध नष्ट होऊन जाईल. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
