👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१० वे, देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ८११
अगुणाचिया समंधा गुणसंबंध करूं । नकळे हा वेव्हारू लोकांमाजीं । हा नाटकु विंदाणी न कळे याची करणी । दाटोनी अंतःकरणीं रिघों पाहे ॥१॥ सर सर रे परता गुणाचिया गुणा । निजसुखनिधाना तूंचि एकु ॥२॥ तुझ्या गुणागुणी वेधलीं मुनिवृंदें । मानसाचिया छंदें वर्तसी तूंचि । आपुलें निज सोंग भुलविलें जयासी । अखंड मानसीं जवळी आहे ॥२॥ ऐसा हा नवलावो विस्मो हा वाटला । भाव हा गळाला काय सांगो । रखुमादेविवरु विठ्ठलु हृदयीं वसे । बाह्यअभ्यंतरी केव्हां वेगळा नव्हे रया ॥४॥
अर्थ:-
परमात्मा मूळचा निर्गुण असून गुणांच्या संबंधाने त्याच्या ठिकाणी लीला दिसतात. पण हे त्याचे करणे सामान्य लोकाच्या नजरेला दिसत नाही. हा परमात्मा मोठा नाटकी आहे. हा आपले मूळचे स्वरुप कळू न देता लोकांना कौतुक करून दाखवित आहे. आपल्या भक्तांना आपला छंद लावण्याचे हे त्याचे नाटक आहे. हा शुद्ध अंतःकरणाच्या भक्तांच्या हृदयांत घुसायला पाहातो. त्यासर्व गुणांचे गुणनिधान अशा श्रीकृष्णाला ज्ञानवान भक्त विनोदाने पलीकडे सर पलीकडे सर असे म्हणतात. पण व्यापक असल्यामुळे पलीकडे सर असे जरी भक्ताने म्हटले तरी तो पलीकडे सरकणार कसा? कारण स्वकीय निर्गुण आत्मसुखाचे निधान तूंच एक आहेस हे सर्व तुझे सगुणरुप मायावी आहे. हे आम्हास पक्के ठाऊक आहे.तुझ्या अंगातील गुणा मुळे मुनिजन वेधुन गेले आहेत. त्यांच्या मनातील छंदाप्रमाणे त्यांना तूं भुलवून नित्य मनांत त्यांच्या अगदी जवळ आहेस. अशा विलक्षण सगुण स्वरुपाचा त्यांना चमत्कार वाटला काय आश्चर्य सांगावे त्यांचा अहंभाव गळून गेला.रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल हे त्या भक्तांच्या हृदयांत वास करुन त्यांच्या कडून वेगळे कधीही होत नाही.असे माऊली सांगतात.
