ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 810

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
image

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१० वे, देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ८१०

भुक्ति मुक्ति कारणे न घालीं तुज साकडीं । हे तों ठायींचीच जोडी । कांहीं जोडिली असे तुज नेणतां हे तुझेंचीदळवाडें । ऐसें जाणोनी फुडें न बोलें दातारा ॥१॥ सलिली तरंग तरंगी सलील । निवडूनियां कोण वेगळे करील ॥२॥ उपाधिभेदें भूमि झाली क्षिती ऐसें विचारितां चित्तीं अनु न देखे । इतुलालें जीवपण तुज मज दातारा वेगळेंची नाहीं रे गोवळ्या ॥३॥ दर्पणाचें दुजेपण दर्पण जंववरी तें काय वेगळाल्या व्यापारीं ठेवूं येईल । नाम घेऊनी ठेले हेम अळंकारु । इतुलाले अंतरू तुज मज रया ॥४॥ वाहटुळीची धांव केवढा वेळु आकाशीं । सहज स्वभावें निमे अपैसी । गगनावरी जातां नलगे पाल्हाळ । तैसें तुज मज सकळ ऐक्य रया ॥५॥ गगना वेगळा घटु केवीं निपजे दातारा यापरी सर्वेश्वरा तूं मी एक । बापरखुमादेविवरु विठ्ठलु भोगिया । येरी असतु वावुगिया गोठी रया ॥६॥

अर्थ:-
मला भुक्ति मुक्ति प्राप्त करुन द्या अशा तऱ्हेचे संकट मी तुम्हाला घालीत नाही. कारण मुक्ति हे माझे स्वरुप आहे. व भुक्ति म्हणजे भोग हा प्रारब्धाधीन आहे. म्हणून हे भगवंता तुला भुक्ति मुक्तिचे संकट घालून काय करावयाचे आहे.? अज्ञानामुळे अनेक जन्माच्या ठिकाणी माझ्या हातून जी काही बरी वाईट कर्मे झाले असतील त्यांचा भोग देण्याकरिता ‘तुझेंचि दळवाडे’ म्हणजे देहादि विचित्र जगताची रचना तूंच केली आहेस. म्हणून त्याबद्दल मी तुझ्यापुढे काही बोलत नाही. ज्याप्रमाणे उदकावर तरंग किंवा तरंगांत उदक हे एकरुपच असते. त्याचे उदक व तरंग कसे दोन शब्दमात्र वेगळे उच्चारले जातात. ते दोन सत्यत्वाने वेगळे कोण करून दाखविणार? आकाराच्या उपाधिमुळे मृत्तिकाच भिंत झाली. अशा दृष्टीने चित्तांत विचार केला असता परमात्मस्वरुपाव्यतिरिक्त दुसरे काही दिसतच नाही. अशा त-हेने परमात्मा एक व जीव एक असा भेद तुझ्या माझ्यामध्ये उपाधिकृत आहे. त्यांत वास्तविक वेगळेपणा मुळीच नाही दर्पणांत दिसणारा दुसरेपणा दर्पणाची उपाधि असेपर्यंत त्या दोन व्यक्ति वेगळाल्या आहेत. असे समजून त्यांना भिन्न, भिन्न व्यवहारामध्ये घालता येईल काय? भिन्न भिन्न नांवे घेऊन जसे अलंकार निराळे असतात, पण सोने एकच असते त्याप्रमाणे तुझ्या माझ्या स्वरुपांत ऐक्य असून जीव शीव नांवे मात्र निराळी आहेत रे बाबा. वाऱ्याची वाहुटळ किती वेळ आकाशांत वाहातं असली तरी आपोआप जशी आकाशरुप होते. तिला आकाशरुप होण्यास वेळ किंवा त्रास पडत नाही. त्याप्रमाणे तुझ्या माझ्या स्वरुपात सहज ऐक्य आहे. व्यापक आकाशाचा आश्रय घेतल्याशिवाय जसा घट केव्हाही उत्पन्न होत नाही. त्याप्रमाणे हे सर्वेश्वरा कृष्णा तूं आणि मी आत्मरुपाने एकच आहोत. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल तेच एक सर्व जगताचा भोक्ता आहे. जगताच्या भेदाच्या गोष्टी औपाधिक म्हणजे पोकळ आहेत. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading