👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१० वे, देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ८०८
फळाचें बीज की बीजाचें फळ । म्हणोनी पत्र पुष्प मूळ चोजवेना ॥१॥ ऐसी हे रचना नकळे गा देवा । सिद्धांतु अनुभवा साक्ष देतो ॥२॥ मृत्तिकेची पृथ्वी की पृथ्वीची मृत्तिका । या गति अनेकां चोजवेना ॥३॥ बापरखुमादेविवरु निरंतरीं । बाह्यअभ्यंतरी नांदतुसे ॥४॥
अर्थ:-
या अभंगांत मांडुक्य उपनिषदातील वृक्षबीजन्यायाने जगताचे अनादित्व सिद्ध केलेले आहे. व त्याच अभिप्रायाने या अभंगाची रचना केलेली आहे. जग आहे असे म्हणणाऱ्याला ते अनादि आहे. असे उत्तर दिलेले आहे. वास्तविक जग नाहीच हाच खरा सिद्धांत आहे. फळा पासून बीज कां बीजापासून फळ हा निर्णय केव्हाही लागणे शक्य नाही. कारण बीज असल्याशिवाय झाड होणार नाही. व झाड असल्याशिवाय फळ येणार नाही. म्हणून झाड अगोदर कां फळ अगोदर याचा निर्णय देता येणार नाही. मग मधले पत्र पुष्प मूळ यांचा निर्णय कसा करता येणार त्याप्रमाणे जगाची रचना कशी झाली आहे. हे काही समजत नाही. कोणत्याही बाजूने दिसते त्यारुपांत जगत उत्पन्न होणे शक्य नाही. असा सिद्धांत अनुभवाला येतो. माती पासून पृथ्वी झाली कां पृथ्वीपासून माती झाली यांचा निर्णय जसा कांहीही लागत नाही. त्याचप्रमाणे तुझ्या स्वरुपाचा निर्णय लागत नाही. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांचे मी सतत ध्यान केल्यामुळे ते माझ्यांत अंतर बाह्य नांदत आहे. असे अनुभवाला आले. असे माऊली सांगतात.
