👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-३रे, श्रीनिवृत्ती व श्रीज्ञानदेव यांचा संवाद अभंग ५८२
सुखी सुख मुरे तेथें कोण झुरे । जळीं लवण विरे तैसेंजालें ॥१॥ ज्ञान तें विज्ञान प्रपंचेंसि भान । तेजोरूप गगन बिंबले दिसे ॥२॥ आत्मा आत्मरुप परमात्मा समीप । कोटि कोटिरुप एकलेंचि दिसे ॥३॥ नाना तेजी भासे प्रपंची प्रकाशे । विरूळा समरसें ध्याये त्यासी ४ ॥ ऐसे जालें तुज प्रगटलें निज । कासवीचे बीज अंकुरलें ॥५॥ निवृत्ति निजबोध आनंदादि कंद । शाखाद्रुम भेद हरि जाला ॥६॥
अर्थ:-
वैषयीकसुख परमात्मसुखामध्ये मुरले असता, पाण्यात जसे मीठ विरून जाते. त्याप्रमाणे विषयसुखही बह्मरूपच होते. आत्मस्वरूप ज्ञान अंतःकरणांत प्रतिबिंबित झाले असता त्याला विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान असे म्हणतात. आणि विशेष ज्ञानाने जसे प्रपंचाचे भान होते. अत्यंत समीप असणारा जो जीवात्मा तो कोट्यवधी रूपाने एकटाच बनलेला परमात्मा आहे.असे दिसते.अरे ज्ञानदेवा, प्रपंच्यांत अनेक रूपाने भासणारा हा परमात्मा एकरूपच आहे असे समजून त्याचे ध्यान करणारा अत्यंत विरळा. पण काय सांगावे तुझ्या परमभाग्याने आज तुला कासवी जसी आपल्या मुलाकडे कृपादृष्टीने पाहून आपले पोर वाढविते. त्याप्रमाणे मी जो तुला आनंदाचा आत्मबोध आणि आनंदाचा कंद दिला. त्यायोगाने तुझ्या ठिकाणी त्या आनंदरूप वृक्षाला शाखा फुटून हरिरूप झाला आहेस. असे माऊलींना निवृत्तीनाथ सांगतात
