👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-३रे, श्रीनिवृत्ती व श्रीज्ञानदेव यांचा संवाद अभंग ५८३
आत्मरूपी रूप रंगले सहज । रिगोनी निजगुज सतेजिलें ॥१॥ तेज बीज बिवडे पेरिलें निवाडे । उगवलें चोखडें ब्रह्मरूप ॥२॥ शांतीची गोफण उडविला प्रपंच । धारणा आहाच स्थिर केली ॥३॥ वेटाळिलें धान्य खळेदान दिठीं । दिधलें शेवटी भोक्तियासी ॥४॥ देते घेते जीवें नुरेचि शेखीं । शिवमय खोपी समरसीं ॥५॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्ति उदारा । ऐसा एकसरा तष्टलासी ॥६॥
अर्थ:-
अत्यंत गुहा श्रुति प्रतिपादित शुद्ध आत्म स्वरूपांच्या ठिकाणी माझे मन रंगन गेल्यामुळे मी तेजस्वी झाला आहे. ज्याप्रमाणे जमिनीमध्ये उत्तम पिक येण्या करिता उन्हाने तापलेली जमीन, चांगले बी, चांगला बिवड (पीक बदलून घेण्याची प्रक्रिया)अशी सामुग्री लागते. त्याप्रमाणे मनुष्य शरीर, तीव्र मुमुक्षुता आणि ब्रह्मानुभवी उपदेष्टा इतकी सामग्री मिळाली असता ब्रह्मस्वरुपाची प्राप्ती होण्यास काय उशीर. पीक जरी उत्तम आले तरी त्या पिकावर बसून दाणे खाणारी पाखरे उडवावी लागतात. त्याप्रमाणे शांतीची गोफण घेऊन प्रपंचाविषयी असलेला सत्यत्वनिश्चय उडवून देऊन चित्तवृत्ति स्थीर केली पाहिजे. नंतर सगळे धान्य खळ्यावर आणून त्यातील बारा बलुत्यांचे भाग त्यास द्यावे लागतात व मग शिल्लक राहिल ते यजमानास मिळावयाचे. त्याप्रमाणे या जीवरूपी शेतकऱ्याला देता देता शेवटी परमात्म स्वरूपाशिवाय काहीच उरत नाही. हे उदारा, निवृत्तीराया मला ब्रह्मानुभवस्थितीला पोहोचवून जे आपण संतुष्ट झाले आहात त्या तुमच्या ऐश्वर्याचे काय वर्णन करावे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
