👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-३रे, श्रीनिवृत्ती व श्रीज्ञानदेव यांचा संवाद अभंग ५८१
निज तेज बीज नाठवे हे देहो । हरपला मोहो संदेहेसीं ॥१॥ काय करू सये कोठे गेला हरि । देहीं देह मापारी हरि जाला ॥२॥ विदेह पैं गंगा पारूषली चित्तीं । चिद्रूपी हे वृत्ति बुडियेली ॥३॥ गुरूलिंगी भेटी निवृत्ति तटाक । देखिलें सम्यक् समरसे ॥४॥ दत्त चित्त वृत्ति ज्ञेयज्ञान कळा । समाधि सोहळा विष्णुरूपी ॥५॥ ज्ञानदेव गाय हरिनामामृत । निवृत्ति त्वरित घरभरी ॥६॥
अर्थ:-
सर्व जगताला अधिष्ठान जे हे तुझे तेजबीज ब्रह्मस्वरूप त्याचे ठिकाणी संशयासह वर्तमान देहसंबंधी मोह हारपून गेल्यामुळे त्याचा आठवही होत नाही. काय करू रे बाळा ! आतां तुझ्या देहाच्या जन्ममरणाचा मापारी. हरिच झाला आहे. म्हणजे तुझ्या ठिकाणी जन्ममरण नाहीच. विदेहरूप गंगासुद्धा तुझ्या देहांत परकी झाली. म्हणजे ती विदेहवृत्ति चिद्रूपातच बुडूनी गेली. तुला उपदेश कर्ता जो मी त्याच्या तटाकावर उभे राहन म्हणजे त्याची सहायता घेऊन सम्यक् प्रकारे गुरूलिंगाचे तुला दर्शन झाले. माझ्या उपदेशाकडे तूं चित्तवृत्ती दिलीस म्हणून ज्ञेय, ज्ञान, समाधी, इत्यादिकांचा सोहळा विष्णुरुप झाला. हरिनामामृताचे मी गायन केल्यामुळे माझे निवृत्तीनाथ फार संतुष्ट झाले असे माऊली सांगतात.