
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ५६८
संसारसातें आलों मी पाहुणा । दिस दोन्ही आनंदा पहावयासी ॥१॥ तंव त्याचेनि तेजें झडपिलें मज । मजमाजीं काज होऊनि ठेलें ॥२॥ चित्त जंव निवडी तंव आपणहि पळे । अवचिता जवळी येतु असे ॥३॥ जाऊं पाहे परता तंव नेतु असे पंथा । वैकुंठीच्या कथा आपण सांगे ॥४॥ एकरूप दिसे तंव सभोंवता आपण । अवघा नारायण ज्ञानदेवा ॥५॥
अर्थ:-
“ज्ञानदेवा घर चिदानंदी” या उक्तीप्रमाणे जीवाचे स्वस्वरूप हेच स्वतःचे घर आहे. त्याने संसारात यावयाचे दुसऱ्याचे घरी पाहुणा जाण्यासारखेआहे. मी या संसाररूपी बाजारांत पाहुणा म्हणून आलो आहे. येथे येण्याचे कारण ब्रह्मानंद व संसारांत भासणारा आनंद यामधील फरक पाहण्याकरताच मी येथे आलो आहे. पण अविद्येचा असा विलक्षण प्रभाव आहे. की त्या क्षणिक संसारानंदाने मला झडपून टाकले त्या मोहाने आपले ठिकाणी कार्य केले.या दोन आनंदाचा ज्यावेळी चित्त निवाडा करू लागले. त्यावेळी ते अज्ञान आपोआप पळून गेले व आत्मस्वरूप जवळ येते म्हणजे प्रगट होते.पुन्हां संसाराकडे पाहू गेले तर ते ज्ञान परमात्मस्वरूपाच्या कथा सांगून योग्य मार्गास लावते. वैकुंठ जो परमात्मा त्याच्या कथा मला ऐकावयास मिळाल्या.संसारांत आलेल्या पुरूषाला सत्संगतीने आत्मज्ञान होऊन सर्वव्यापक परमात्म्याची प्रतीती येते असे ज्ञानदेव सांगतात.
