
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५६०
भ्रमरीच्या ध्यासें भ्रमरीच होय । कीटकत्व जाय पालटोनी ॥१॥ ब्रह्म ध्यासे स्वयें ब्रह्मचि होईजे । जीवत्व लोपिजे सहजची ॥२॥ किडाळ त्यजिले चोखाळचि नाहीं । आणि हे पाही अनादिची ॥३॥ जुनाटचि आहे जाणा सोयरिक । माया उपाधिक भ्रमलाशी ॥४॥ विचार करितां सर्व एकाकार । म्हणे ज्ञानेश्वर सत्ययोगी ॥५॥
अर्थ:-
ज्याप्रमाणे भिंगोट्याच्या घरांत असलेली अळी भिंगोटा आपल्याला मारील या भीतीने ध्यास घेऊन भिंगोटाच बनते. त्याप्रमाणे मी ब्रह्म आहे असा ध्यास घेऊन ब्रह्म होऊन जा. म्हणजे सहज जीवपणा नष्ट होईल. हीणकट पणा गेला म्हणजे. उत्तम सोन्यावांचून दुसरे काहीच नसते. जीवब्रह्माची एकता अनादि आहे, पण मायेच्या उपाधीने जीव भ्रमिष्ट झाले आहेत. विचार करुन सर्व जीव ब्रह्मरुप आहेत. असे जो जाणतो. तोच खरा योगी असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
