👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-११ वे, योग अभंग ३५५
सत्रावीचा खेळ लक्षवेना कवणा । ब्रह्मादिक जाणा अगम्य तें ॥१॥ रात्रंदिवस मन चपळत्वें धावतें । तेही सत्रावीतें नपवेची ॥२॥ सत्रावी अगम्य विधि हरिहरां । लक्षूं पाहतां बरा गोविंदु गे ॥३॥ ज्ञानदेव दर्शन सत्रावीचें घेतां । उन्मनी ठसावी निवृत्तिदाता ॥४॥
अर्थ:-
योगाभ्यासाने योगी लोक आपल्या हृदयातील कुंडलिनी शक्ती जागृत करून तिचा धक्का ब्रह्मस्थानांत असलेल्या अमृतसरोवरात देतात. त्यामुळे अमृत थोडे थोडे गळू लागते. त्या अमृतालाच सत्रावीचे ‘पय’ असे म्हणत प्रमाणे ती कुंडलिनी जागृत करून अमृतपान करणे हे योगी लोकांना मोठे त्रासाचे असते. त्या सत्रावीचा खेळ मोठा विचित्र आहे. तो ब्रह्मदेवाला, नेहेमी भटकणाऱ्या मनाला, विष्णु व शंकर यानांही कळण्यास कठीण आहे. या खटपटीत पडण्यापेक्षा गोविंद नामोच्चार करणे सोपे आहे. निवृत्तीराया कृपेने सत्रावीयेच्या अमृत कलेची प्राप्ती झाली तर उन्मनी दशा सहज ठसावते. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
