👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके विरहिणी अभंग ८९६
त्रिभुवनींचें सुख पहावया नयनीं । दिनरात्री धणी न पुरे माझी ॥१॥ विटेवरी सांवळा पाहतां पैं डोळां । मन वेळोवेळां आठवितु ॥२॥ सागरी भरीतें दाटे तैसें मन उल्हाटे । वाट पाहों कोठे तुझी रया ॥३॥ बापरखुमादेविवरू पूर्ण प्रकाशला । कुमुदिनी विकासला तैसें जालें ॥४॥
अर्थ:-
त्रिभुवनाचे सुख जो परमात्मा त्याला रात्रंदिवस पाहण्याविषयी माझ्या डोळ्यांची तृप्ती होत नाही. जो विटेवर असलेला सांवळा विठोबाराय त्याची मन वारंवार आठवण करीतच असते. सागरामध्ये जशी भरती दाटते त्याप्रमाणे मन त्याच्या चिंतनांत रंगून जाते. आतां तुझी कोठे म्हणून वाट पाहुं. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते सर्वत्र पूर्ण प्रकाशीत आहेत हे कमळिणीच्या विकासावरून जसे कळून येते त्याप्रमाणे अंतःकरणवृत्तीच्या विकासावरून त्याचे प्रकाशत्व कळून येते. त्या कमळिनीप्रमाणे माझे मनाची स्थिती झाली आहे. असे माऊली सांगतात.