👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके विरहिणी अभंग ८८७
येणेरू पाहावासी तरि असुमाय होसी । माझ्या मना नाकळसी सांवळ्या ॥१॥ सगुणपणाची तुझी पडिलिसे मिठी । केली जीवासाठी सांवळ्या । वेधला जिऊ माझा सिकवाल काई । सगुण ठाई वेधियेलें ॥२॥ ये अंगणी अवचिता देखिला बोलता । कोण ऐसा निरूता न कळे गे माये । सगुण म्हणोनी धरूं गेलें पालवीं । तंव नवलपणाची ठेवी प्रगट केली ॥३॥ आंतु बाहेंरी काही नकळे वो मज । आपआपणिया चोज वाटोनी ठेलें । बापरखुमादेविवरें माझें मीपण चोरूनी नेलें । आपणा ऐसें केलें बाई यावो ॥४॥
अर्थ:-
सांवळे सकुमार सुंदर अशा रूपाने तुला पहावा तो तूं माझ्या पोटांत मावत नाहीस. आणि मनालाही आकलन होत नाहीस. तरी पण हे सांवळ्या श्रीकृष्णा तुझ्या सगुणपणाची मिठी पडून मी आपल्या जीवाच्या संतोषाकरिता तुला मनांत धरून ठेवले. त्या सगुणरूपाच्या ठिकाणी माझा जीव वेधून गेल्यामुळे मी अशी वेडी झाले. मला तुम्ही किती शिकवाल.या माझ्या अंगणात अवचित बोलताना श्रीकृष्णास पाहिले तर हा कोण आहे असे खरोखर कळत नाही.तो सगुण म्हणून त्यांचा पदर धरू गेले तर त्यांनी आपल्या स्वकीय स्वरूपाची ठेव प्रगट केली.आतां अंतरबाह्य मला काही दिसत नसून माझेच मला कौतुक वाटू लागले आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीकृष्ण यानी माझा मीपणा चोरून नेऊन मला आपल्यासारखा म्हणजे परमात्म स्वरूप करून ठेवले. असे माऊली सांगतात.
