👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके विरहिणी अभंग ८७८
कृष्णे वेधिली विरहिणी बोले । चंद्रमा करितो उबारा गे माये । न लवा चंदनु आंगी न घाला विजणवारा । हरिविणे शून्य शेजारू गे माय ॥१॥ माझे जिवींचे तुम्ही कां वो नेणां । माझा बळिया तो पंढरिराणा वो माय ॥२॥ नंदनंदनु घडी घडी आणा । तयावीण न वाचती प्राणा वो माये ॥ बापरखुमादेविवरू विठ्ठलु गोविंदु । अमृतपान गे माय ॥३॥
अर्थ:-
श्रीकृष्णानी छंद लावलेली विरहणी म्हणते. हा चंद्रमा अतिशय थंड खरा पण बाई, मला उबारा करतो ग. या उबाऱ्याच्या निवृत्तीची व्यवहारिक साधने म्हणजे अंगाला चंदन लावणे. किंवा वारा घालणे ही आहेत परंतु ती करू नको. कारण माझ्या अंगाचा दाह होण्याचे कारण आज माझ्या बिछान्यावर श्रीकृष्ण नाही हे आहे. ही माझ्या जीवातली गोष्ट तुला कशी कळत नाही ? माझ्या अंगाचा दाह निवारण करणारा बलवान तो पंढरीचा राजाच एक आहे. याकरिता वारंवार तुम्हाला एवढेच सांगते की तो नंदाचा नंदन श्रीकृष्ण त्यालाच घेऊन या. त्याचेवांचून माझे प्राण वाचत नाही. माझे पिता व रखुमादेवीचे पती जो श्रीविठ्ठल गोविद त्याची प्राप्ती होणे हे माझ्या शरीराचा दाह निवृत्त करण्याला अमृतपानच आहे. असे माऊली सांगतात.