
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके गौळणी अभंग ८६०
सांवळीये निळी भुलली एकी नारी । परेचा वो घरीं शुद्धि पुसी ॥१॥ सांग गे बाईये कवणें घरी नांदे । कैसें या गोविंदें हिंडविलें ॥२॥ चहूं मार्गी गेलें न संपडे वाट । मग चैतन्याचा घाट वेंधलिये ॥३॥ ज्ञानदेवी समाधी स्थान पैं विठ्ठल । अवघा चित्तीं सांडला हारपला ॥४॥
अर्थ:-
शामसुंदर श्रीकृष्णाला पाहून भुललेली एक गौळण परावाणीला विचारु लागली की अग तो श्रीकृष्ण परमात्मा कोठे नांदतो आहे हे मला सांग, मी तर त्या गोविंदाचे घराचा शोध करण्यांत धुंडून, धुंडून दमले. चारी वेदांला पुसले तरी त्याचा ठाव सांपडेना व मग स्वकीय ज्ञानांचाच घाट जो श्रीकृष्ण परमात्मा त्यानेच मला वेध लावला. तात्पर्य अंतःकरणवृत्ति आपले अधिष्ठान चैतन्याचा शोध करु गेली तेव्हा तिचे समाधान तेथेच झाले. त्याच विठ्ठलाचे ठिकाणी माझे समाधि स्थान असल्यामुळे माझे चित्तातील संपूर्ण चंचलता नाहीसी झाली असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
