👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-११ वे, बुद्धीरूपी सखीशी संवाद अभंग ८३४
तत्त्वतां पैं तत्त्व धरितां नये हातां । मग ममतेची चिंता तयासी पुसें ॥१॥ बाई कोणे घरी सांगे वो जिवित्व । परेचे परतत्त्व कोणे धरीं ॥२॥ सखी सांगे गोष्टी बाईये रुप वो धरीं । आपणची घरी सांपडेल ॥३॥ निवृत्तीनें खुणें सांगितलें ज्ञान । रखुमादेविवरु ध्यान विठ्ठलवरदा ॥४॥
अर्थ:-
एक सखी, आपल्या मैत्रिणीस परमात्मा कोणाच्या घरी आहे ग अशी विचारते. कारण परमतत्त्वांचा विचार केला तर ते तत्त्व हातांस येत नाही. आणि परमतत्त्वांच्या प्राप्तीची चिंता तर सारखी लागून राहिलेली आहे. ते परावाणीहून पलीकडे असणारे परमतत्त्व जें सर्वजीवांचे जीव ते कोणाच्या घरी आहे. सखी तिला उत्तर सांगते. बाई श्रीगुरुला शरण जाऊन त्यांच्या उपदेशाप्रमाणे विचार केला तर तुमच्या घरांत तें सांपडेल. कारण तुझा जीवच लक्षांशाने परमतत्त्व आहे. ही खूण निवृत्तिरायांनी मला दिल्यामुळे त्या परमतत्त्वाचे ज्ञान होऊन रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांचे ध्यान मला लागले आहे. असे माऊली सांगतात.
