👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-११ वे, बुद्धीरूपी सखीशी संवाद अभंग ८२९
ममता पुसे सये शिवींजिवा ठायें । पूर्णता पान्हाये कोणे घरीं ॥१॥ ऐक सखिये पुससी बाईये । परब्रह्म समाये पुंडलिका ॥२॥ नाहीं यासी ठावो संसार पैं वावो । एकतत्त्व रावो घरीं वसे ॥३॥ बापरखुमादेविवरु उदारु ओळला । विश्वजनपाळा ब्रीद साजे ॥४॥
अर्थ:-
श्रीकृष्णाच्या ठिकाणी अत्यंत ममता म्हणजे प्रीती असलेली एक सखी आपल्या सखीला विचारते. सये जीव परमात्म्याचे ऐक्य होऊन परमानंद अभिव्यक्त होतो. असे घर कोणते? म्हणजे कोणत्या ठिकाणी कोणत्या अवस्थेत ही स्थिति प्राप्त होते. हे बाई तूं पुसत असेल तर सखे ऐक पुंडलिकाचे घरी ते सगुण ब्रह्म सर्व सामावलेले आहे. वस्तुतः निर्गुण ब्रह्माला ठाव म्हणजे आश्रय मुळीच नाही. कारण ते आपल्या महिम्यातच असते. त्याला आश्रय संसार मानला तर वस्तुतः संसार मिथ्या असल्यामुळे तोही आश्रय होऊ शकत नाही. म्हणून तो एकतत्त्वरुप चक्रवर्ति परमात्मा स्वतःच्या घरी आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पति श्री विठ्ठलांनी उदार होऊन मजवर कृपा केली म्हणजे विश्वजनक, पालक हे जे त्याचे ब्रीद तें त्यांनी खरे केले असे माऊली सांगतात.
