👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१० वे, देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ८१९
तुझेनी बळें मांडली फळी । तुवां जवळी असिलें पाहिजे ॥१॥ ऐसीये जुंजीं घालिसी मज । काकुळती तुज नाहीं आतां ॥२॥ रणभूमी आला रणवट घातला । पाहों जो लागला न देखे कांहीं ॥३॥ ज्ञानदेवो म्हणे उफराटें पाहाणें । खुंटलें येणें जाणें येची भेटी ॥४॥
अर्थ:-
तुझ्या स्वरूपाच्या आश्रयावर ही संसाराची फळी म्हणजे द्वैताचा बाजार मांडला आहे. त्या गर्दीत तूं माझ्याजवळ असले पाहिजे. अशा संसाररुपी बाजाराच्या युद्धांत ढकलून देऊन माझ्याविषयी तुला दया येत नाही. धैर्य धरून ह्या संसाररूपी रणभूमीवर मी आलो. आणि संसार म्हणजे काय ते पाहू लागलो.तो संसार दिसेनासा झाला. बहिर्मुख वृत्तिला परत फिरवून परमात्मस्वरूप पाहू गेले असता पाहणेही थांबते व जन्ममरणही नाहीसे होते. याचेच नांव परमात्म्याची भेट
होय असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
