👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१० वे, देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ८१३
काळा पैं गोवळु काळासी अलोट । नामामृतें पाठ भक्ता देहीं ॥ नित्य सुख आम्हां तपांचिया कोडी । न लगती परवडी व्रतें तीर्थें ॥१॥ सुलभ सोपारा सर्वांघटीं अससी । साधुसंगें दिससी आम्हां रया ॥२॥ चैतन्याशेजारीं मन पैं मुरालें । सांवळे सानुलें हृदयघटीं ॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलराज । निवृत्तीनें बीज सांगितलें ॥३॥
अर्थ:-
जो भगवान श्रीकृष्ण तो स्वरुपाने काळा असून जगाचे भक्षण करणारा जो काळ त्या काळाचाही काळ आहे. अशा श्रीकृष्णाच्या नामामृताचा पाठ भक्तांच्या हृदयांमध्ये असल्यामुळे ते नेहमी सुखी आहेत. त्या सुखाकरिता कोट्यवधी तपे अगर व्रते अथवा तीर्थे भक्तांना करावे लागत नाही. सर्व जीवमात्रामध्ये सहज रितीने भरलेला तूं साधुसंगतीने आम्हाला स्पष्ट दिसतोस.तुझ्या चैतन्यरुप बिछान्याच्या ठिकाणी आम्हा भक्ताचे मन मुराले. त्यामुळे अंतःकरणरुपी घटांत तुझे सांवळे व सकुमार लहानरुप स्पष्ट दिसत आहे. अशा त-हेचा परमात्मा माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल हाच सर्व जगाचे बीज आहे. असे श्रीगुरु निवृत्तिरायांनी आम्हास सांगितले असे माऊली सांगतात.
