👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१० वे, देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ८०१
म्हणोनी तुझें रूप देखिलिया दिठी । जय सच्चिदानंद पदेसी मिठी । ओंकारेंसी त्रिपुटी न साहे तो तूं सगुण जगजेठी । या दृष्टीचेनी सुखें माये हृदयीं भासले रूप । शेखीं पाहतां का आम्हां चाळविसी रया ॥१॥ आतां सेवेलागी सेवा करणे कोणच्या अंगें । स्वामीपणे जगी होऊनी ठेलें ॥२॥ तें सांवळिये प्रमाण न दिसे अनुआन । शेखीं ध्यानीं विरालें तें मन गे माये । रूप खुंतलें पण पाहाची हा संपूर्ण तेथें द्वैताद्वैतपण हरपलें रया ॥३॥ आतां बुद्धीयोग इंद्रियांचा तो तूं गोपवेष साचा । भक्तियोगाचा सौरसु दाविसी आतां । बापरखुमादेविवरा विठ्ठलाच्या पायीं सुख । तेंच दरूशन एक जालें रया ॥४॥
अर्थ:-
तुझा साक्षात्कार झाल्यामुळे तुझे वर्णन करणारी सत्, चित्, आनंद ही पदे मावळून गेली.तसेच आकार, उकार व मकार ही तीन पदेही ओंकारासहवर्तमान मावळून गेली असा जो निरुपाधिक स्वयंप्रकाश जगदीश तो तूं भाविक भक्ताकरिता शामसुंदर झाला आहेस. सगुणाची ही दृष्टी असल्यामुळे आनंदाने तुझे सगुणरूप हृदयामध्ये भासते. शेवटी पाहतां व विचार करताना आम्हाला तूं आपले निर्गुण रूप लपवून सगुणरूपाने फुकट चाळवितोस. आतां तुझ्या सगुणरूपाची सेवा करण्याकरिता तूं कोणच्या अंगाने म्हणजे पूज्य रूपाने जगांत आहे सांग बरे. त्या सांवळ्यां सगुण मूर्तिविषयी सत्यत्व ठरविण्याला अजून प्रमाण दिसत नाही. कारण निर्गुणाचा विचार करू लागले असता सगुणाचे ध्यान करणारे मनही नाहीसे होते. एवढ्यावरून शून्यवादमत येत नाही. सर्वांचे लयस्थान द्वैताद्वैताचा ग्रास करून सच्चिदानंद परमात्मा पूर्ण राहातो. असा अबाधित निश्चय झाल्यानंतर बुद्धिचा व इंद्रियांचा ज्याच्याशी संयोग होत आहे. तो तूं खरोखर गोपवेष घेतलेला असल्यामुळे भक्तीयोगाचे प्रेमसुख दाखवित आहेस रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्याचे पायी म्हणजे स्वरूपाचे ठिकाणी असणारे जे अद्वितीयसुख तेच ज्ञान एकरूप होऊन गेले असे माऊली सांगतात.
