👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-२ रे, हरिपाठ अभंग ६५
संतांचे संगतीं मनोमार्ग गती । आकळावा श्रीपति येणें पंथें ॥१॥ रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा । आत्मा जो शिवाचा राम जप ॥२॥ एकतत्व नाम साधिती साधन । द्वैताचें बंधन न बाधिजे ॥३॥ नामामृत गोडी वैष्णवां लाधली । योगियां साधली जीवनकळा ॥४॥ सत्वर उच्चार प्रल्हादीं बिंबला । उद्धवा लाधला कृष्णदाता ॥५॥ ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥६॥
अर्थ:-
मनाचा मार्ग सोडुन साधुमार्गाने गेले की तो श्रीपती आकळतो कळतो. वाचेत सतत रामकृष्ण जप व आत्मारामात शिवाचा जप हा जीवांचा भाव असावा. द्वैताचे बंधन टाकुन एकतत्वाने हरिनाम साधन व तेच साध्य साधता येते. एकदा नामामृताची गोडी वैष्णवांना लाभली की त्यांना जीवनकळाच प्राप्त होते. ह्याचा नाममृतामुळे प्रल्हाद भक्त झाला व उध्दवाला कृष्णकृपा झाली.नामपाठ करणे हे सर्वात सुलभ आहे पण हे जाणारे फार दुर्लभ आहेत. असे माऊली सांगतात.
