👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६३१
ब्रह्मपदाची प्राप्ती उमगेल दृष्टी । परम चैतन्याचे पोटी विश्वंभरू वो माय ॥१॥ अवघाचि देखिला अवघा मालवला । देखोनि निवला जीव गे माय ॥२कापुराची पुतळी कपुरदीपु पाजळी । तैसी मी त्याच्या मेळीं जाहलें वो माय ॥३॥ तेथे रूप ना छाया त्रिगुण ना माया । रखुमादेविवराचिया उपाये वो माय ॥४॥
अर्थ:-
सदगुरूकृपेने ज्याची दृष्टी उगवेल त्याला ब्रह्मपदाची प्राप्ती होईल. नंतर त्या ब्रह्माचे अंतर्भूत विश्वाचे भरण पोषण वगैरे कर्ता ईश्वर आहे.असाही निश्चय होईल. सर्व त्रैलोक्य परमात्मस्वरूपाने दिसू लागले म्हणजे सर्व विश्वाकार आपोआपच मावळून जाणार यात नवल काय? मला परमात्मदर्शन झाल्यामुळे माझा जीव शांत झाला. कापुराची एक पुतळी केली आणि ती कापुराच्या दीपाने पाजळली तर ती दोन्ही एकरूप होऊन जातात.त्या प्रमाणे त्या परमात्मस्वरूपाचे ऐक्यात माझी स्थिती झाली. त्या परमात्म्याच्या ठिकाणी रूप नाही. मायेत वा बुद्धीत त्याची छाया नाही.कारण मूळ मायाच नाही असे समजणे हा रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल प्राप्तीचा उपाय आहे. असे माऊली सांगतात.
