👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६२४
सुवेळेची शेज अवेळे घातली । प्रवृत्ति मोहिली निःसंदेह ॥१॥ मोहें न खुंटलें ममते तुटलें । एकरसीं भरलें तत्त्वीं तत्त्व ॥२॥ प्रपंचाचे घरी दिसते कारण । अवघे निराकारण तत्त्वीं तत्त्वमय ॥३॥ बापरखुमादेविवर त्रिपुटीं न दिसे । रसीं रस भासे हृदयदीपीं ॥४॥
अर्थ:-
आत्मज्ञानप्राप्ती करिता खर्च झालेला वेळ म्हणजे सुवेळ होय. पण तोच काल संसारसुखांत घालविला तर अवेळ ठरतो. अशा प्रपंचाच्या खटपटीत गुंतल्याने मनःप्रवृत्ति निःसंशयपणे प्रपंचातच लुब्ध होईल. प्रपंचाच्या मोहांत गुंतून न पडता माझेपणापासून दूर राहिल्यास सर्व जगत ब्रह्मरूपच आहे असे वाटेल. प्रपंच करीत असताच ज्या अधिष्ठानांवर प्रपंच मिथ्या भासतो तो प्रपंच अधिष्ठानांतच लय पावल्यावर एकरसी ब्रह्मतत्त्वच सर्वत्र भरले आहे. असा अंतःकरणात अनुभव येईल. माझे पिता व रखुमादेवीचे पति श्रीविठ्ठल सत्त्व,रज, तम याचे पलिकडचे असून हृदयातील प्रकाशदीपात तर रसत्वाने भासतात असे माऊली सांगतात.
