👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-३रे, श्रीनिवृत्ती व श्रीज्ञानदेव यांचा संवाद अभंग ५९९
सोंग संपादणी एका रूपें करी । आत्मा घरोघरी वर्ततुसे ॥१॥ माय सांग आम्हां कोण सुख ब्रह्मा । तुम्हां आम्हां समा कोण्या रूपें ॥२॥ चेतनें चेतवी बुद्धीतें पाचारी । कल्पना मापारी निवृत्ति ठायीं ॥३॥ ज्ञानदेव दिवटा विठ्ठलीं रमला । संसार अबोला एकातत्त्वें ॥४॥
अर्थ:-
एक परमात्मतत्त्व घरोघरी म्हणजे प्रत्येक जीवमात्राच्या जीवात्मरूपाने प्रवेश त्या त्या जीवांच्या कर्मानुसार सोंगसंपादणी करून राहात आहे. हे माऊली श्रीगुरूराया तुमच्या आमच्यामध्ये ते समानरूपाने कसे राहाते व त्या परब्रह्माचे आम्हाला कसे प्राप्त होईल ते सांगा. चिदाभासाला ज्ञान देणारा बुद्धिला चालना देऊन कल्पनेची भरोवरी करून त्याचा मापारी श्रीगुरू निवृत्तीरायच आहेत. जो श्रीगुरू निवृत्तिराय त्याच्या कृपेने परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी निवांत राहून संसारा विषयीचे मौन मी धारण केले.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
