👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-३रे, श्रीनिवृत्ती व श्रीज्ञानदेव यांचा संवाद अभंग ६००
परब्रह्मीं वस्ती कोण्या रूपें करूं । सकळ हे भरू आत्मतत्त्वें ॥१॥ देहाचा दीप की समत्व पैं ज्योती । एकरूपें वाती सर्वांरूपीं ॥२॥ तें रूप सांगा निवृत्ति उदारा । संसार एकसरा तयामाजीं ॥३॥ समान निघोट क्षेमत्त्वें अवीट । श्रीगुरूनें वाट सांगितली ॥४॥ ज्ञानदेवीं घर वस्तीसी बिढार । तळींवरी साचार एक तत्त्व ॥५॥
अर्थ:-
मी परब्रह्माचे ठिकाणी कोण्यारूपाने म्हणजे उपायाने वस्ती करू? सर्वत्र आत्मतत्त्व भरून राहिले आहे. असा अनुभव कोणत्या उपायाने घेऊ? व सर्व देहामध्ये एकरूपाने प्रकाशित असणारी आत्मज्योति त्या आत्मज्योतीने सर्व त्रैलोक्य व्याप्त करून परमात्म स्वरूपाचे ठिकाणी मी कशी वस्ती करावी. हे उदार, श्रीगुरूनिवृत्तिराया सर्व संसार एकदम ज्या परमात्म स्वरूपामध्ये सामावतो ते रूप मला सांगा. परमात्मतत्त्व निघोट म्हणजे निष्पतिबंध सर्वात क्षेमत्वाने समान असून कोणालाही त्याच्या विषयी वीट येणे शक्य नाही. अशा परमतत्त्वाच्या प्राप्तीची वाट श्रीगुरू निवृत्तिरायांनी सांगितली. त्यामुळे त्या परमात्मतत्त्वाचे घरांत बिऱ्हाड ठेऊन वस्ती केली. म्हणजे मी परमात्मस्वरूपच झालो. आता वर,खाली सर्व परमात्मतत्त्वच आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.