
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-३रे, श्रीनिवृत्ती व श्रीज्ञानदेव यांचा संवाद अभंग ५९५
सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायीं । तेथे बुडी देई माझ्या मना ॥१॥ आतां मी न करी भ्रांतीचे भ्रमण । वृत्तीसी मार्जन केलें असे ॥२॥ एकार्णव झाला तरंगु बुडाला । तैसा देह झाला एकरूप ॥३॥ बापरखुमादेविवरें विठ्ठलें नवल केलें । तारूं हरविले मृगजळी ॥४॥
अर्थ:-
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे मना, ब्रह्मरूप जे निवृत्तिनाथ त्यांच्यापायी सर्व तीर्थ असल्यामुळे तुही तेथे स्थिर हो. गुरूकृपेने वृत्ति निर्मळ होऊन आतां मी देह आहे ही भ्रांती नष्ट झाली. म्हणून सुखाकरीता इकडे तिकडे तिर्थयात्रेकरिता भटकण्याची जरूरी नाही. ज्या प्रमाणे समुद्रावरच्या लाटेला मानलेला भित्रपणा नाहीसा होऊन ती जसी समुद्ररूप होते त्याप्रमाणे या देहाचा मिथ्यात्व निश्चय होऊन मी ब्रह्मरूप आहे असे ज्ञान मला झाले. माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठ्ठल, त्यानी एक असा चमत्कार करून दाखविला की मृगजळांत मिथ्या नाव नाहीसी व्हावी याप्रमाणे माझा देहात्मभाव नाहीसा केला. असे माऊली सांगतात.
