👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-३रे, श्रीनिवृत्ती व श्रीज्ञानदेव यांचा संवाद अभंग ५९१
भ्रमर रसद्वंद्व विसरला भूक । त्याहुनी एथे सुख अधिक दिसे ॥१॥ जंववरी भुली तंववरी बोली । समुद्रींची खोली विरळा जाणे ॥२॥ आशापाश परी निवृत्ति तटाक । पडियेले ठक चिद्रुपरूपीं ॥३॥ प्रकाश हरीचा प्रकाशला देहीं । नेणतीच कांहीं मूढजन ॥४॥ ऐलतीरी ठाके पैलतीरीं ठाके । तेथे कैसेनी सामर्थं पाहों आतां ॥५॥ जाणीव शहाणीव तूंचि निवृत्ति देवा । हरि उभय भावा ज्ञान देशी ॥६॥ ज्ञानदेवा शांति उन्मनी रहस्य । हरिरूप भाष्य करविलें ॥७॥ बापरखुमादेविवर विठ्ठलहृदयीं । आलिंगितां बाही भ्रमर जाला ॥८॥
अर्थ:-
जीवरूपी भ्रमराला ब्रह्मानंद मिळाल्यामुळे विषयरूपी द्वंद्वातील सुखाच्या भुकेला तो विसरतो. त्याला या इंद्रियसुखापेक्षा येथेच गोडी वाटते. विषयसुखाच्या भोगाची इच्छा जोपर्यंत प्रपंच सत्यत्व भ्रम आहे तोपर्यंतच असते. त्या विषय सौख्याचे खोल मूळ ब्रह्मानंदच आहे. हे संसारात जाणणारा अत्यंत विरळा. आशापाशांचा शेवट आशेची निवृत्ति होणे हा आहे. आणि त्या आशेची अत्यंत निवृत्ती चैतन्यरूप ब्रह्माच्या ठिकाणी वृत्ति चिकटुन राहीली तरच होते. सर्व देहामध्ये परमात्म्याचाच प्रकाश आहे. हे मंदबद्धीला कळत नाही. प्रपंचाच्या अलीकडच्या व पलीकडच्या म्हणजे प्रवृत्ति निवृत्तिच्या तटाकाला सर्वत्र परमात्माच भरला असल्या मुळे आता तो अमुकच ठिकाणी आहे. असे कसे पाहावे. कारण सर्वत्र तोच आहे. हे निवृत्तिराय परोक्ष अपरोक्ष दोन्हीभावामध्ये हरीच व्याप्त आहे. हे ज्ञान तुम्हीच मला देऊन उन्मनी किंवा शांति याचे रहस्य जो परमात्मा तोच सर्वत्र असल्याचे माझ्याकडून वदविले. माझ्या हृदयामध्ये असलेल्या श्रीविठ्ठलाच्या स्वरूपावर रममाण होणारा मी तुमच्या व माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांच्या कृपेने भ्रमर झालो.
