👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-३रे, श्रीनिवृत्ती व श्रीज्ञानदेव यांचा संवाद अभंग ५८७
देहधर्मी काज गुरूराज चित्तीं । तरीच या संपत्ती फळद होती ॥१॥ तैसें तुझें ध्यान करिता उद्भट । सांपडली वाट वैकुंठीची ॥२॥ ज्ञेय ज्ञाता ज्ञान ध्येय ध्याता हरि । समरसे श्रीहरि तत्त्व जालें ॥३॥ पृथ्वी आप तेज गगनाकृति वायो । फिटला सदेहो ये जन्मींचा ॥४॥ उपदेश द्रष्टा जरी असे श्रेष्ठ । तरीच भाग्य विनट विष्णुरूपीं ॥५॥ ज्ञानदेवी सिद्धी साऊली श्रीहरि । गुरूकृपा करी कुरवाळिलें ॥६॥
अर्थ:-
देहधर्म प्रारब्धाप्रमाणे कसाही असो. परंतु मनुष्य देहाचे फळ जी परमार्थ सिद्धी तो खरोखरी फलप्रद व्हावयाची असेल तर चित्तांत श्रीगुरूचे रात्रंदिवस ध्यान पाहिजे. तर ही विवेक वैराग्यादि शमदमादि संपत्ति फलप्रद होतील ज्ञानोबाराय तुझे ध्यान उद्भट म्हणजे तीव्रअसल्यामुळे तुला परमात्मप्राप्तीची वाट सापडली, त्यामुळे तुझी स्थिती अशी झाली की ज्ञेय ज्ञाता, ज्ञान ध्येय ध्याता, ध्यान ही त्रिपुटी सर्व परमात्मरूपच झाली. पंचमहाभूते देहाचे जन्ममरण याविषयीचा तुझा संदेश फिटला पण ही गोष्ट केव्हा घडते ? उपदेशकरणारा श्रेष्ठ यथार्थ शास्त्रद्रष्टा असेल तरच भाग्यवान विष्णु स्वरूपाच्या ठिकाणी प्राप्त होतो, मला ही स्थिती श्रीहरिच्या कृपेने लाभली असली तरी याला श्रीगुरूनिवृत्तिरायांनी माझ्यावर कृपा करून मला पोटाशी धरले. हे मुख्य कारण आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.