👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-३रे, श्रीनिवृत्ती व श्रीज्ञानदेव यांचा संवाद अभंग ५८०
आदि मध्य अंत तुजमाजी बिंबे । ब्रह्मीं ब्रह्म थांबे लवण जळीं ॥१॥ तैसे झालें ज्ञाना उन्मनी उलथा । प्रपंच चळथा उडालिया ॥२॥ रिगु निगु काज जालें तुझें घर । अवघा कळेला आम्हां ॥३॥ गोप्य गुजराज उमजलासे हरि । दिसें अभ्यंतरी आत्माराम ॥४॥ न दिससी ज्ञाना देहीं तुझ्या राम । तिला विश्राम ऐसे दिसे ॥५॥ निवृत्ति निवांत समरसे पाहात । अवघाचि दिसत देहीं विदेह ॥६॥
अर्थ:-
निवृत्तीनाथ म्हणतात, हे ज्ञानोबा, जगताचा आदि, मध्य व अंत हे तुझ्या भास्वरूपाच्या ठिकाणीच भासत आहेत. मीठ ज्याप्रमाणे जलामध्ये एकरूप होते. त्याप्रमाणे ब्रह्मरूप होऊन ब्रह्माच्याच ठिकाणी त्याचा लय होतो. हे ज्ञानोबा, तुला उन्मनी अवस्था प्राप्त झाल्यामुळे प्रपंचाच्या चिळकांड्या उडुन गेल्या त्याच्या उत्पत्ती नाशाचे घर तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणीच आहे. अशारितीने तुझ्या ठिकाणी संसाराची स्थिती असल्याचे आम्हाला दिसून येते. तुझ्या जीवाला हे गोप्याचे गोप्य जो श्रीहरी तो उमजून आहे. आणि तोच तुझ्या अंतर्बाहा स्वरूपांत आहे असे दिसते. हे ज्ञानोबाराया, तुझ्या हृदयामध्ये असलेली श्रीरामाची प्रगटता लोकांना दिसत नाही. पण तूं मात्र त्या रामाच्या ठिकाणी विश्राम पावलास असे दिसते. अशा तहेची ज्ञानेश्वर महाराजांची भूमिका निवृत्तीनाथांना कळून आली. असे माऊली सांगतात.
