👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-३रे, श्रीनिवृत्ती व श्रीज्ञानदेव यांचा संवाद अभंग ५७६
सार सप्तमीसी हारपली निशी । दशवे द्वारेसी उभा राहे ॥१॥ तेथें तूं सावध अवघाचि गोविंद । देहीं देहाभेद करू नको ॥२॥ इंद्रियांच्या वृत्ति दशवे द्वारीं गति । देहगेह उपरती होईल तज ॥३॥ विस्तारी विस्तार गुण गुह्य सार । एकाएकीं पार सार धरीं ॥४॥ विकृति विवर प्रकृति साचार । तत्त्वाचा निर्धार समरसीं ॥५॥ निवृत्ति सांगे ज्ञाना एक तूं करी । तरी तूतें कामारी होईल चित्तें ॥६॥
अर्थ:-
पंचज्ञानेंद्रिये मन व बुद्धी या सातापैकी सार जी बुद्धी ती ज्यावेळी ब्रह्मरंधरूप दहाव्या दारांत उभी राहिली. तेव्हा अज्ञान त्यासह वर्तमान बुद्धी लीन होऊन गेली. त्या ठिकाणी तूं सावध चित्ताने राहिलास म्हणजे सर्व गोविदरूपच होशील. देही म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देह वेगळा मान् नको. त्याच प्रमाणे त्या दहाव्या घरामध्ये तुझ्या देहाच्या घराची इंद्रियाच्या वृत्तीची उपरती होईल.जगताच्या विस्तारामध्ये त्याचप्रमाणे सत्त्व रज तम गुणामध्ये अन्वय ज्ञानाने तोच पूर्ण भरलेला आहे. व्यतिरेक ज्ञानाने तो सर्वाच्या पलीकडे असून मुख्य सार आहे. तो तूं बळकट धर.मूळ प्रकृतिची म्हणजे मायेची जगरूपी विकृति हे विवर असून खऱ्या तत्त्वाचा निर्धार एकरूप आहे. निवृत्तीनाथ म्हणतात हे ज्ञानोबा तूं एक कर की त्या परमात्म्याचे ज्ञान करून घे. त्यामुळे माया ही तुझी मनोभावाने दासी होईल.असे माऊली सांगतात.
