👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-३रे, श्रीनिवृत्ती व श्रीज्ञानदेव यांचा संवाद अभंग ५७१
स्वामीचे कृपेने चिद्घन ओळलें । रसातळ पाल्हेळें ब्रह्मतेजें ॥१॥ कृपाळु श्रीगुरू ओळला सर्वत्र । आपेआप चरित्र दृष्टि दावी ॥२॥ ॐकाराचे बीज समूळ मातृकी । दिसे लोकां लोकी एकतत्त्वीं ॥३॥ अविकारी साकार अरूपी रूपस । दावी आपला भास आपणासहित ॥४॥ सर्वांग समतेज ऐसा हा चोखडा । पाहतां चहुंकडा दिव्यतेज ॥५॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्तीशी पुसिलें । सत्रावी दोहिले पूर्ण अंशीं ॥६॥
अर्थ:-
स्वामी श्रीगुरू निवृत्तीरायांच्या कृपेने ज्ञानस्वरूप ब्रह्माची मला प्राप्ती झाली. त्यामुळे पाताळादि चतुर्दशभुवने एका ब्रह्मस्वरूपानेच व्यापून टाकली आहेत असे मला दिसले. तो दयाळु श्रीगुरू त्याने आमच्यावर कृपादृष्टी केल्यामुळे आम्हाला आत्मस्वरूपाचे ऐश्वर्य दृष्टीस पडलें. व त्यामुळे ‘अ उ म’ ह्या तीन मात्रेसहित ॐकार स्वरूप परमात्मा सर्व लोकांत एकरूपाने दिसतो. परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी आकार नसतांना आकार कसा प्राप्त झाला? रूप नसताना रूप कसे प्राप्त झाले? त्याचे कारण नामरूपात्मक मिथ्या वस्तु ब्रह्मावरच भासते. व हेच सोळा कलांनी युक्त अशा लिंगशरीरास आश्रयभूत आहे म्हणून त्याला सत्रावी कला म्हणतात त्याचेच चहूंकडे दिव्य तेज प्रकाशते. मी माझ्या निवृत्तीरायांना विनंती करून त्या सत्राव्या जीवनकलेचे दूध मागितले. तेंव्हा माझ्या त्या विनंतीला मान देऊन निवृत्तीरायांनी त्या सतराव्या जीवनकलेचे दूध काढून मला पोटभर दिले.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
