👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-३रे, श्रीनिवृत्ती व श्रीज्ञानदेव यांचा संवाद अभंग ५७०
अरे स्वरूपाकारणें विश्वरूप घेतलें । सगुणे झांकिलें निर्गुणरया ॥१॥ तत्त्वी तत्त्व कवळी उगवे रविमंडळी । अवघीच झांकोळी आपुल्या तेजें ॥२॥ द्रष्टयाचिये दीप्ती दृश्यचि न दिसे । समरसी भासे तेज त्याचें ॥३॥ चित्स्वरूपी नांदे चित्स्वरूपी भासे । ॐकारासरिसे तदाकार ॥४॥ प्रेमकळी ओतले सोज्वळीत तेज । तेथे तूं विराज ज्ञानदेवा ॥५॥
अर्थ:-
आपल्या भक्तांकरिता भगवंतानी विश्वरूप धारण केले व त्यामुळे निर्गुण स्वरूप झांकून गेले. मूळच्या निर्गुण स्वरूपाची कळा ज्यावेळी सूर्य तेजाप्रमाणे अंतःकरणांत उगवते. त्यावेळी बाकीची वैषयीक अनात्मज्ञाने सर्व लोपून जातात. सूर्य तेजापुढे सचंद्र नक्षत्रे लुप्त होतात. त्याप्रमाणे जो आत्मज्ञानवान द्रष्टा त्याच्या यथार्थ प्रकाशापुढे दृश्य म्हणून दिसतच नाही. सर्व द्रष्टा होऊन जातो. हा सर्व व्यवहार परमात्म्याच्या सत्स्वरूपावर भासतो चित् स्वरूपांवर नादतो आणि सत् चित् आनंद स्वरूपांचे प्रतिक जो ॐकार तोही तद्रूपच होऊन जातो. त्या प्रेम कळीत म्हणजे आनंद स्वरूपांत ओतलेले जे निर्दोष ज्ञान त्याच स्वरुपाचे ठिकाणी तूं विराजमान हो असे निवृतीरायांनी उत्तर दिले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.