ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 566

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-२ ले, एकविध अभंग ५६६

पूर्वदिशे भानु उगवला नळनी । कमळणी कमळी विकासु केला । उष्णकरू अस्तु जाला शीतकरू । प्रवर्तला कमळणी संकोचु केला गे बाईये ॥१॥ पढियंते मानसी बहुवसे । असे दरी तें जवळीच वसे रया ॥२॥ दोलक्षीं सोम अंबरीं । त्याचे गुण उमटती सागरीं । आंवसे कळाहीनु येरू दिसे अंधारी । समुंधु ये शरीरी रया ॥३॥ गगनीं वोळली घनुचरें । तेणे क्षितीवरी नाचती मयूरें । सोमशीतपणें कळा मिरवी । अमृत घेवो जाणती चकोर रया ॥४॥ वोळलीं स्वातीची अंबुटे । ते तत्व झेलिती शुक्तिका संपुष्टे । येरें नक्षत्रे वरूषती निकटें । काय जळ तयाचे वोखटे रया? ॥५॥ चातकु चंद्राते चिंतितु । ते तयांचे मनोरथ पुरवितु । बापरखुमादेविवरू विठ्ठलु । तो मी सदा हृदयीं ध्यातु रया ॥६॥

अर्थ:-

पूर्वदिशेस सूर्योदय झाल्याबरोबर नीलकमळे उमलतात व सूर्यास्त होऊन चंद्रोदय झाला म्हणजे ती कमळे मिटतात. त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा उदय याला असता मनरूपी कमळ प्रफुल्लित होते. अज्ञानकाली तो परमात्मा फार दूर आहे असे वाटते. ज्ञानोदय झाला असता तो जवळच आहे असे अनुभवाला येते. शद्ध किंवा कृष्ण पक्षात चंद्र आकाशातच असतो पण त्याचे गुणभरती ओहोटीरुपाने समुद्रात उमटतात तो चंद्र अमावस्येला कलाहीन असतो. आणि पौर्णिमेला अंधाराचे प्रकाशन करतो. त्याप्रमाणे या शरीरांत परमात्म्याचा संबंध आहे. त्याचे योगाने प्रारब्ध कर्मानुसार अंतःकरणाच्या ठिकाणी कधी सुखाची भरती येते.व कधी ओहोटी होते. आत्मरूपाच्या अज्ञानदशेमध्ये आत्मा प्रकाशशून्य असल्यासारख दिसतो श्रवणाने अंतःकरणात त्याच्या ज्ञानाचा कमी अधिक प्रमाणात उदय होतो पण हेही होणे अज्ञानातीलच आहे. आकांशात संचार करणारे मेघ वर्षाव करण्याच्या तयारीत असले म्हणजे पृथ्वीवरील मोर नाचू लागतात. त्याप्रमाणे जात्मज्ञानाचा उदय होणार असे समजून मुमुक्षु सात्त्विक भावाने आनंदित होतात. चंद्र आपल्या शितळ कळांनी परिपूर्ण असता ते चंद्रांमृत सेवन करण्याची हातवटी चकोराला आहे. त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा उदय झाला असता त्याचा आनद भोगण्याची योग्यता अधिकारी पुरूषांनाच असते. स्वातीचे नक्षत्रांचे पाणी पडू लागले असता मोती उत्पन्न करणाऱ्या शिपी आपल्यामध्ये थेब वरच्यावर धारण करितात. बाकीची नक्षत्रे वर्षाव करू लागले तरी त्यांच्यापासून मोती उत्पन्न होत नाही. म्हणुन ते पाणी वाईट म्हणावे काय? वरील दृष्टांताप्रमाणे अधिकारी पुरूषाला आत्मज्ञानाचे श्रवण घडले म्हणजे त्याच्या अंतःकरणरूपी शिंपल्यात मुक्तिरूपी मोती तयार होतात बाकीचे पदार्थ निरूपयोगी म्हणून अधिकाऱ्याचे अंतःकरण ग्रहण करित नाही. चातक पक्षाला चद्रोदय केव्हा होईल याचे चिंतन लागलेले असते.म्हणुन चंद्र उदयाला येऊन चंद्रामृत देऊन चातक पक्षाचे मनोरथ पूर्ण करतो. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांचे मी अंतःकरणांत नेहमी ध्यान माझे मनोरथ पूर्ण करतो. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading