👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५५५
सुवर्णाचे भाडें दुधाचे आधण । कुसुंबा घालुनी नाश केला ॥१॥ तोडुनि चंदन कर्दळीचें वन । बाभुळा रक्षण बैसविलें ॥२॥ उत्तम भूमिका कमाविली पाही । धोत्रा लवलाही पेरियेला ॥३॥ ज्ञानदेव म्हणे ऐसें न करावें । शरण रिघावें सदगुरुसी ॥४॥
अर्थ:-
सोन्याच्या भांड्यात दूध तापवून त्यांत कुसुंबा टाकून ते जसे नासवून टाकावे, किंवा चंदनाचे व केळीचे वन तोडून त्याठिकाणी बाभळीची झाडे लावून त्याच्या रक्षणाकरिता रक्षक बसवावे. जमिनीची उत्तम मशागत करुन त्यात धोत्रा पेरणे अशा गोष्टी जशा मूर्खपणाच्या ठरतील त्याप्रमाणे हा महान भाग्याने प्राप्त झालेला मनुष्यजन्म केवळ विषय सेवनांत घालविला तर मूर्खपणाचाच ठरेल.असे मूर्खपणाचे कृत्य करु नये. तर मनुष्याने सद्गुरुला शरण जाऊन आपल्या जन्माचे सार्थक करुन घ्यावे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
