👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५५४
त्रिवेणींचे स्नान अखंडित करा । काशीवासीं मरा ज्ञानेवीण ॥१॥ तया नाहीं गती वस्ती निरंजनीं । भोगी रुद्रयोनी कर्मवसे ॥२॥ लिंगदेहभंग जंव झाला नाहीं । तोवरी बा पाहीं मुक्ती कैची ॥३॥ ज्ञानदेव म्हणे करावें सुमन । तरीच चिद्घन पाविजे तो ॥४॥
अर्थ:-
तुम्ही त्रिवेणीचे अखंडित स्नान करा, नाही तर काशीत मरा पण ज्ञाना वाचून निरंजन परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी गती होणे शक्य नाही.पवित्र त्रिवेणीचे किंवा काशीवासा सारखे पुण्य कर्म केले आहे म्हणून तो त्या पुण्यकर्माच्या योगाने रुद्रयोनी भोगेल. पण हे निश्चित आहे. जोपर्यंत दशेंद्रिय, पंचप्राण आणि सोळावे अंतःकरण मिळून जो लिंगदेह आहे त्याचा नाश झाला नाही. तोपर्यंत त्याला मुक्ति कशी मिळणार. जर अंतःकरण शुद्ध केले. तरच ज्ञानस्वरुप परमात्म्याची प्राप्ती होईल असे माऊली ज्ञानदेव सांगतात.