👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५४५
ब्रह्मप्राप्ती पूर्ण झाली ज्या नराला। अंतरबाह्य झाला प्रकाशची॥१॥बाहेर भीतरी लावी जैसा दीप। सबाह्य अमूप रूप फांके॥२॥अग्निसंगे लोहतत्त्व थोर नेटे। उभवतो दाटे हुताशन॥३॥तैसा ब्रह्मीं लाहे हृदयी त्रिनेत्र। बाह्य निरंजन अवघा झाला॥३॥निवृत्तीचे पायीं ज्ञानदेव लीन। जग जनार्दन निरंतर॥५॥
अर्थ:-
ज्याप्रमाणे कंदिलात दिवा लावला म्हणजे त्याच्या आंत बाहेर सर्व प्रकाश दिसतो. त्या प्रमाणे ज्या पुरूषाला ब्रह्मप्राप्ती झाली. त्याच्या आत बाहेर ज्ञानाचे तेज दिसते. लोखंड अग्नीत ठेवून तापवले म्हणजे ते जसे अग्नीमय होते. त्या प्रमाणे ब्रह्मप्राप्तीनंतर ब्रह्मज्ञानी पुरूषाला तिसरा ज्ञाननेत्र प्राप्त होतो. व मायेचे आवरण नाहीसे होते. मी निवृत्तीच्या पायी लीन झाल्यामुळे सर्व जगत मला जनार्दनरुपच दिसू लागले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.