
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५४१
मरण न येतां सावधान व्हा रे । शोधूनी पावा रे निजवस्तू ॥१॥ अंतकाळी जरी करावें साधन । म्हणतां नागवण आली तुम्हां ॥२॥ नाशिवंत देह मानाल शाश्वत । तरी यमदूत ताडितील ॥३॥ काळाचे खाजुके जाणिजे कीं काया । धरूं नको माया सर्वथैव ॥४॥ अमोलिक प्राप्ती होत आहे तुज । धरूनियां लाज हित करीं ॥५॥ मागुती न मिळे जोडलें अवचट । सायुज्याचा पाट बांधुनी घेईं ॥६॥ ज्ञानदेव म्हणे विचारा मी कोण । नातरी पाषाण होउनि राहा ॥७॥
अर्थ:-
मरण येण्यापूर्वीच सावध व्हा व आत्म स्वरूपाचा शोध करून ती वस्तू मिळवा. मरणाच्या वेळी आत्मप्राप्तीचे साधन करू असे म्हणाल तर यातच तुमची नागवण झाली आहे. हा क्षणभंगूर देह कायम टिकणारा असे मानून विसंबाल तर यमदुत केंव्हा मारतील याचा नेम नाही. हा देह म्हणजे यमाचा खाऊ आहे म्हणून त्याचा लोभ धरू नका. तुला बहुमोल वस्तु प्राप्त होणार आहे. ती प्राप्त करून, न घेतल्यास मूर्ख ठरशील याची लाज धरून हित करून घे. हा मानव देह पुन्हा सहज मिळणार नाही, मोठ्या भाग्याने प्राप्त झाला आहे. तो पर्यंत सायुज्यमुक्तिरूप पाठ बघून घे. मी कोण याचा विचार करा नाहीतर दगडा सारखे खुशाल राहा. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
