👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५४०
मोक्ष मेल्या पाठी आम्हांसी होईल । ऐसें जे म्हणतील अतिमूर्ख ॥१॥ दीप गेल्यावरी कैचा जी प्रकाश । झाका झाकी त्यास कासयाची ॥२॥ जंववरी देह आहे तंववरी साधन । करूनियां ज्ञान सिद्ध करा ॥३॥ गृह दग्ध न होतां शिंपीजे उदकशेखी तो निष्टंक काय कीजे ॥४॥ आहे मी हा कोण करावा विचार । म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा ॥५॥
अर्थ:-
मेल्यावर आम्हाला मोक्ष मिळणार आहे. असे मानणारे महामुर्ख आहेत. जसे दिवा मालवल्या वर प्रकाश कसा राहील व मग घरांतील झाकाझाक कशी करणार जोपर्यंत देहांत जीव आहे. तोपर्यंत प्रयत्न करून ज्ञान प्राप्त करून घेतले पाहिजे घर जळून खाक झाले नाही. तो पर्यंतच विझवण्याची खटपट केली जाहिजे ते जळून गेल्यावर पाणी मारण्याचा काय उपयोग होणार. मी कोण आहे याचा अगोदर विचार करा. म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करून घ्या. असे निवृत्तीनाथांचे शिष्य माऊली ज्ञानेश्वर सांगतात.