
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५३२
चोहटा मिष्टान्न जे काही सांडलें । सुनियासी झालें सुकाळ पैं ॥१॥ तैसा तो अभक्त वाढिन्नला जगीं । काळ तयालागीं ग्रासितसे ॥२॥ जे कां पारंगत श्रेष्ठ भागवत । चळचळां कापंत काळ तया ॥३॥ तयाचिया दृष्टी मोहरा न राहे । धाऊनियां जाय अज्ञान तीं ॥४॥ निवृत्तीदासाचा झालों निजदास । वंदिती तयास ब्रह्मादिक ॥५॥
अर्थ:-
चव्हाट्यावर टाकलेल्या मिष्टानाचा कुत्र्यांना सुकाळ होतो. त्याप्रमाणे जगामध्ये भगवद्भक्ती न करता वाढलेल्या पुरुषाचा ग्रास काळ करित असतो. भगवद्भक्ती पारंगत भगवद्भक्तांच्या पुढे काळ चळचळा कापत असतो. त्याच्या दृष्टीपुढे अज्ञान येऊच शकत नाही. ब्रह्मदेवादिक ज्या श्री गुरु निवृतीरायांना वंदन करतात. त्यांचा मी दास झालो असे माऊली सांगतात.
