👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५३१
सर्वत्र परिपूर्ण सर्वांघटीं वसे । अभाग्यासी कैसें पडल आलें ॥१॥ मायेच्या भुलारें भुलले विश्वजन । जनी जनार्दन न देखती ॥२॥ आत्मा, आत्मीं भाविता देहीं । मायेच्या डोही बुडाले कैसें ॥३॥ बापरखुमादेविवर सगुणी न समाये । निर्गुणी दिसताहे जनवन ॥४॥
अर्थ:-
परमात्मा सर्वत्र परिपूर्ण भरलेला असून दुर्दैवी लोकांच्या दृष्टिवर पडळ आल्यामुळे त्यांना दिसत नाही. सर्व जग मायेच्या भुरळाने भुलून गेले आहे. कारण जगांत अधिष्ठानरुपाने परमात्माच आहे. हे त्यांना कळत नाही. या देहाच्या ठिकाणी कोणी आपला आत्मा म्हणजे पुरुष व आत्मी म्हणजे स्त्री समजतात आहेत. लोक मायारुप डोहांत कसे बुडाले पहा. माझे पिता व रखुमाईचे पती श्री पांडुरंग केवळ सगुण मूर्तिच नसून जन वन वगैरे सर्व जगांत अधिष्ठानरुपाने भरलेला प्रत्यक्ष निर्गुण परमात्मा दिसत आहे.