👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५१३
ब्रह्म जयाचिये बोधेंचि पावत । ते जगीं शाश्वत गुरुमूर्ति ॥१॥ शब्दज्ञानें जया गुरू उपदेशिती । नाही त्यासी मुक्ति कदाकाळी ॥२॥ संसारी तरोनी शिष्यासी तारिती । तेचि मानिजेति गुरू एक ॥३॥ काम क्रोध लोभ जे का न शिवती । तेची ओळखी सद्गुरू जाण ॥४॥ ज्याशी नाही भेद ब्रह्मीं एकाकार । म्हणे ज्ञानेश्वर तोचि गुरू ॥५॥
अर्थ:-
ज्याच्या बोधाने ब्रह्मप्राप्ती होते. तीच जगांत सत्य गुरूमूर्ति होय. शब्दज्ञानी याला उपदेश करतात, त्याला केंव्हाही मुक्ति प्राप्त होणार नाही. आपण संसारातुन तरून जे शिष्यांनाही तारतात. अशा पुरूषालाच जाणते लोक गुरू समजतात. ज्यांना काम, क्रोध वगैरे विकार स्पर्श करू शकत नाहीत असल्या सदगुरूंना ओळखण्याची हीच खूण समज.ज्याच्या ठिकाणी भेदबुद्धि नसून सर्वत्र ब्रह्मदृष्टि असेल त्यांनाच सद्गुरू असे समजावे.असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
