👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५१४
सद्गुरूवांचूनी संसारी तारक । नसेचि निष्टंक आन कोण्ही ॥१॥ इंद्र चंद्र देव ब्रह्मांदी करूनी । संशयाची श्रेणी छेदती ना ॥२॥ उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ति । पुरविती आर्ती शिष्याचिया ॥३॥ वंचना करिती जन दुष्ट नष्ट । मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती ॥४॥ ज्ञानदेव म्हणे गुरूचा मी दास । नेणें साधनास आन कांहीं ॥५॥
अर्थ:-
सद्गुरूवांचून संसार समुद्रातून तारून नेणारा निःसंशय दुसरा कोणी नाही.इंद्र चंद्र ब्रह्मदेव इत्यादि देव असले तरी ते शिष्याच्या ठिकाणचा संशय दूर करू शकणार नाहीत. सद्गुरू हे साक्षात् परब्रह्मच असून ते आपल्या शिष्याची ‘सदिच्छा पूर्ण करतात. असा सद्गुरूंचा अधिकार न कळल्यामुळे मूर्ख लोक त्यांची निंदा करतात. पण जाणते पुरूष मात्र त्यांना त्याचा अधिकार ओळखून वंदनच करतात. मी माझ्या सद्गुरूंचा एकनिष्ठ सेवक आहे त्यांच्या सेवेशिवाय इतर साधने करण्याचे मला माहीत नाही. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.