👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-११ वे, योग अभंग ३५३
शून्य शोधिलें नाही जेणें । काय विवरण केलें तेणें । अज्ञानपणें फुगणें । गाढव जिणे पशूचे ॥१॥ वर्णाकृति शून्याचार । हा नाहीं ज्या विचार । न घडे न घडे साक्षात्कार । जाण सर्वथा तया नरा ॥२॥ आधीं शून्याची शोधणी केली । मग सद्वस्तु प्राप्ती झाली । अमृत वेळाची बोली । बोलतां नये ॥३॥ आधी शून्य तें शुभ्रवर्ण । मध्ये श्वेत रचिलें जाण । अर्ध शून्य तें ताम्रवर्ण । प्रत्यक्ष जाण दिसतसे ॥४॥ महाशून्याचा वर्ण निळा । अव्यक्त तेजाचा ओतिला गोळा । ग्रासूनि ठेला भूगोळा । योगी डोळा पाहती ॥५॥ ऐसे शून्याचे नाही ज्ञान । तंववरी अवघेच अज्ञान । जनीं अवघा जनार्दन । अज्ञान सज्ञान काय बोलें ॥६॥ ब्रह्मज्ञानाची किल्ली । सांगितली एकेंची बोली । निवृत्तिराजें बोलविली बोली । तेंची बोली बोलिलों ॥७॥
अर्थ:-
योग्याभ्यासीला दिसणारा ‘निल’ तेजोमय बिंदु हेच कोणी शून्य ज्याने पाहिले नाही. त्याने कशाचा विचार केला? व न कळण्याने ज्याचा अहंकार वाढला अशा मनुष्याचे जगणे गाढवा सारखे व्यर्थ होय. ज्या ब्रह्माच्या ठिकाणी याचा साक्षात्कार, वर्णभेद नाही. लहान मोठे स्थूळ कृश हा आकारभेद नाही. अशा साक्षात्कार योग्यावाचून इतरांना होणार नाही. अगोदर ते नीलबिदुरूप शून्य पाहिले. व मग आम्हाला आत्मवस्तुची प्राप्ती झाली, त्या अमृतमय वेळेचे वर्णन शब्दांनी करता येत नाही. तो बिंदु बाहेरून पांढरा त्याच्या आत शुभ्रवर्ण व आतील भाग तांबूस दिसतो.शून्याची आतिल बाजू जिला महाशून्य असे म्हणतात. ती निळ्या रंगाची असते. ती इतकी तेजस्वी असते की जणू काय तिच्यामध्ये ब्रह्मतेजच भरले आहे असे वाटते. जगाचा निरास करून योगी लोक हे शून्य पाहातात. का तहेच्या शून्याचे ज्ञान झाले नाही, तोपर्यंत सर्व अज्ञानच आहे असे समजावें ते पाहिले तर आत्मा सर्वव्यापक असल्यामुळे कोणाला ज्ञानी म्हणावे, कोणाला अज्ञानी म्हणावे व कोणाला संज्ञानी म्हणावे? कारण दोन्ही ब्रह्मरूपच आहेत. श्री गुरु निवृत्तीनाथांमुळे ब्रह्मज्ञानांची गुरूकिल्लीमला मिळाली.व त्यांनी ती माझ्याकडून बोलवली तशी मी बोलून दाखविली असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
