👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २३१
चोराचिया संगे क्रमितां पै पंथ । ठकूनिया घात करितील ॥ काम क्रोध लोभ घेऊनिया संगे । परमार्थासा निघे तोंचि मूर्ख ॥ बांधोनिया शिळा पोंहू जाता सिंधु । पावे मतिमंदु मृत्यु शीघ्र ॥ देह गेह भ्रांती सोडुनिया द्यावे । साधन करावे शुद्ध मार्गे ॥ ज्ञानदेव म्हणे तरीच साधेल । नाही तरी चळेल मध्यभागी ॥
अर्थ:-
चोराबरोबर केलेल्या यात्रेत फसवणुकीचा संभव असतो. काम क्रोध व लोभ हे सोबती बरोबर घेऊन परमार्थ करण्याला निघालेला मनुष्य महामुर्ख आहे असे समजावे.धोंडा गळ्यात बांधून समुद्रात पोहून जाण्याची इच्छा करणारा मुर्ख मनुष्य लवकर मृत्यूला प्राप्त होतो. याप्रमाणे वरील चोराची संगती करणारा मनुष्य नाश पावतो. याकरिता घरदार व देह या सर्वांची भ्रांती टाकून शुद्ध परमार्थ मार्गाचे साधन करावे. नाही तर मधेच भलत्या मार्गाला जाईल, असे माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात.
