👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-३ रे, नामसंकीर्तन महात्म्य अभंग १०८
त्रिभुवनीचें सुख एकतत्त्व विठ्ठल । नलगे आम्हां मोल उच्चारितां ॥ विठ्ठल उघडा मंत्र कळिकाळा त्रास । घालूनिया कास जपों आधीं ॥ सत्वर सत्वाचे जपती नामावळी । नित्यता अंघोळी घडे रया ॥ बापरखुमादेविवरु जिव्हाळा ह्रदयीं । जीवाचा जीव ठायीं एक पाही ॥
अर्थ:-
त्रिभुवनाचे सुख असणारा श्री विठ्ठल असुन त्याचे नाम उच्चारायला कोणतेच मोल द्यावे लागत नाही. कंबर बांधुन म्हणजे निर्धार करुन हा नाममंत्र उच्चारला तर त्याचा धाक कळीकाळाला असतो. ह्या सत्वनामाची नामावळी जपली की सुखाचे सचैल स्नान सहज घडते. सर्व जीवांच्या ठायी असणारे तेच माझे पिता व रखुमाईचे पती आहेत असे माऊली सांगतात.
