ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.986

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके कुट  अभंग ९८६

सुकलिये गंगे वऱ्हाड आलें । उतार नाही म्हणोन मुरडोनी गेलें । मनगुणीचे तंती ओंविली धरणी । पिसोळिया ओझें वाईलें रया ॥१॥ तूं ते कवण मी ते कवण । कवण बांधावें तोरण । योगी दिगंबर संन्यासी जे काय । वरमाये हाती कंकण रया ॥२॥ आप तेज पृथ्वी वायो आकाश । या भासास उटणे केलें । वांझेचिया पुत्रा चोखणी मर्दिलें । ऐसें नवल ज्ञान जालें रया ॥३॥ वरबाप वोहबाप जन्मलेचि नाहीं । तंव नवरा नवरी कवणची काई । बापरखुमादेविवर चिंतितां । तरी तें सुख निवृत्तिपायीं ॥४॥

अर्थ:-
‘शब्दब्रह्मी होशी आगळा । म्हणसी न भीये कळिकाळा । बोधेवीण सुखसोहळा । आहे तो जिव्हाळा वेगळाचि ॥, या चरणांत वर्णन केलेल्या परोक्षज्ञानी असलेल्याचे वर्णन माऊली या अभंगातून करीत आहे. लग्नाला आलेली जी मंडळी त्यांना वऱ्हाड़ असे म्हणतात.त्याप्रमाणे परमात्म्याशी आपले लग्न लावण्याकरिता (ऐक्यबोधा करीताच) हा मनुष्यदेह प्राप्त झाला आहे. असे असून सर्व शास्त्रध्ययन केलेला वऱ्हाडी म्हणजे केवळ शब्दज्ञानसंपन्न असलेला पंडित म्हणाला. ोोमायेतून तरून जाण्याची भीती कशाला बाळगता? कारण तिला पाणी नाही ती सुकून गेली आहे. म्हणजे माया नाहीच. असे तोंडाने सांगू लागला. परंतु प्रत्यक्ष प्रसंग आला त्यावेळी तिला उतार नाही म्हणून मागे परत फिरला. म्हणजे तिच्यातून तो तरून गेला नाही. उलट तोंडाने मात्र म्हणतो. अहो धरणी म्हणजे प्रपंच हा मनकल्पित आहे हे त्याचे म्हणणे यथार्थ अनुभव नसल्याने वेड्याप्रमाणे ओझे वाहिले. योगी दिगंबर संन्यासी जे कोणी असतील त्याना म्हणाला अरे तूं योगी वगैरे काही नाही तर ‘ते, म्हणजे ब्रह्म, तूं आहेस हे मी तुला कां सांगतो तर मी कोण असेल तर ते ब्रह्म आहे. म्हणून मी तुला सांगतो असे जीवब्रह्मैक्याचे तोरण कोणी बांधावे. मला बोध झाला आहे म्हणून वरमाय जी बुद्धि कारण बोध हा बुद्धित होतो.म्हणून ती वरमाय आहे व तिच्या हातांत कंकण बांधले.पंचमहाभूते ही भासास म्हणजे भासमात्र आहे. त्यांचे उटणे केले व ते उटणे बुद्धिला तात्त्विक बोध झाला नव्हता म्हणून ती वांझ अशा तिच्या बोधरूपी पुत्राला ते उटणे चांगले मर्दन केले म्हणजे ते पंचमहाभूते कल्पित आहेत असे सांगू लागला. हे त्याचे ज्ञान आश्चर्यकारक आहे. तात्त्विक वरबाप म्हणजे ब्रह्म जन्मले नाही म्हणजे ब्रह्मरूप झाला नाही. वोहबाप म्हणजे ज्ञान जन्मले नाही म्हणजे झाले नाही. मग मुक्तिरूपी नोवरी व तिचा नवरा हे शब्दज्ञानामुळे काही एक नाही. यथार्थ बोधाकरिता श्रीगुरूनिवृत्तीरायांचे चरणीलागून माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांचे चिंतन केले तरच तो बोध प्राप्त होऊन ब्रह्मसुख प्राप्त होईल.असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading